Ad will apear here
Next
करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज
.

करवीर छत्रपती राजाराम (दुसरे) यांचे दत्तक पुत्र म्हणजे चौथे शिवाजी महाराज यांचा २५ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दल...
.......
करवीर छत्रपती राजाराम (दुसरे) यांचे इ. स. १८७०मध्ये अकाली निधन झाले. त्यांना पुत्रसंतान नव्हते. पुन्हा गादीच्या वारसाचा प्रश्न उपस्थित झाला. दत्तक घेणे अपरिहार्य होते. दत्तकासाठी निवड केलेला मुलगा राण्यांना पसंत पडला नाही तर राजघराण्यात कटकटी वाढू लागतात. म्हणून मुलाच्या पसंतीसाठी हालचाली सुरू झाल्या. योग्य मुलांची पाहणी करण्यात आली. एकूण सात मुलांची पाहणी झाली. या सात मुलांपैकी दिनकराव भोसले-सावर्डेकर यांचा मुलगा नारायणराव यांची निवड करण्यात आली. हा मुलगा बुद्धिमान आणि प्रकृतीने उत्तम होता. त्याचा स्वभाव शांत आणि वागणे भारदस्तपणाचे होते. 

नऊ वर्षांचे असताना नारायण दिनकरराव भोसले करवीर गादीवर छत्रपती झाले. त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले गेले त्यामुळे ते चौथे शिवाजी महाराज झाले. त्यांचा जन्म कोल्हापूर येथील सावर्डे येथे पाच एप्रिल १८६३ रोजी झाला. महाराजांचे व्यक्तिमत्त्व उंचपुरे, रुबाबदार होते. २३ ऑक्टोबर १८७१ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्ताला त्यांचा दत्तकविधी झाला. राज्याभिषेक करून चौथे शिवाजी महाराज कोल्हापूर राज्याचे छत्रपती झाले. महाराजांना घोडेस्वारी, शस्त्र-शास्त्र व राज्यकारभारात विशेष रुची होती. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा आणि मोडी लिपीवर प्रभुत्व होते. 

ब्रिटिशांकडून होणारे जुलुम छत्रपतींनी पाहिले होते. त्याबाबत महाराजांकडे माहिती येत होती. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत व त्यांच्या पुण्याईने हे राज्य मिळाले आहे. रयतेच्या कल्याणाची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, या भूमिकेतून ते सतत कार्यरत राहिले. 



इ. स. १८७६ साली भारतात फार मोठा दुष्काळ पडला होता. चौथ्या शिवाजी महाराजांनी कोल्हापूर संस्थानात दुष्काळ निवारण यंत्रणा राबवली, दुष्काळावर मात केली. ठिकठिकाणी अन्नछत्रे घातली. छत्रपतींची ही कामगिरी पाहून जानेवारी १८७७मध्ये ब्रिटिश साम्राज्याची महाराणी व्हिक्टोरिया यांनी छत्रपतींना ‘नाइट कमांडर ऑफ दी स्टार ऑफ इंडिया’ हा किताब दिला; पण पुढे काही दिवसांनी छत्रपतींनी हा सन्मान नाकारला. 

पुढे इ. स. १८७८ साली श्रीमंत वाघोजीराव शिर्के यांची कन्या यमुनाबाई यांच्याशी महाराजांचा विवाह झाला. छत्रपतींनी आपल्या कारकिर्दीत कोल्हापूर संस्थानात खूप मोलाचे कार्य केले. रंकाळा तलाव निर्मिती कार्यास सुरुवात, पूल उभारणी, रस्ते, नवीन राजवाडा, शासकीय इमारती, कचेऱ्या, टाउन हॉल आदी वास्तूंची उभारणी याच काळात झाली. तेच आता कोल्हापूर शहराचे वैभव आहे. 

महाराजांनी इंग्रजाविरुद्ध बंड पुकारले. जानेवारी १८७८मध्ये ब्रिटिशांनी स्टेट कारभारी म्हणून महादेव बर्वे यांची नेमणूक केली. महाराज अल्पवयीन असल्यामुळे राज्याचा सगळा कारभार दिवाण महादेव बर्वे पाहत होते. तो फार स्वार्थी, लाचार आणि धूर्त होता. त्याने आपल्या संबंधित शंभरहून अधिक लोक प्रशासनात घुसवले होते. त्याने इंग्रजांच्या मदतीने राज्य खालसा करण्यासाठी कटकारस्थानाला सुरवात केली. महाराजांना वेड लागले आहे अशी अफवा तो पसरवू लागला. महाराजांचा मानसिक छळ करून त्यांना मनोरुग्ण ठरवण्याचा हा कट होता. इंग्रजांच्या मदतीने त्याने कोल्हापूरमध्येच महाराजांना एकांतात बंदिस्त केले. 

१९ जून १८८२ रोजी त्यांना गुप्तपणे पुणे मार्गाने अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात हलवले. किल्ल्यात एका इमारतीत एकांतात त्यांना ठेवण्यात आले. त्या भागात कोणालाही फिरकण्याची बंदी होती. पक्क्या बंदोबस्तात ठेवलेल्या कैद्यासारखी महाराजांची अवस्था केली होती. खासगी नोकराखेरीज फक्त इंग्रज प्रायव्हेट ग्रीन हाच दांडगा सैनिकगडी त्यांच्या सोबतीला ठेवला होता. या सर्वाचा अर्थ एवढाच होता, की त्यांना सर्व परिचित व्यक्ती आणि वातावरण यापासून वेगळे काढून कैद्याप्रमाणे जीवन कंठावे लागत होते. त्यामुळे त्यांची मनस्थिती अधिकच बिघडत गेली होती. त्यांच्या पत्नीलाही त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आले होते. एकांतात ठेवल्यामुळे त्यांच्या प्रकृतीसंबंधीच्या अनेक बातम्या बाहेर पसरू लागल्या. प्रायव्हेट ग्रीन त्यांना बेदम झोडपून काढत असल्याचे समजू लागले. त्यांची छळवणूक अधिक होत असल्याच्या बातम्या बाहेर पसरू लागल्या. त्यामुळे लोकांचा संताप अधिकच वाढू लागला. 

महाराजांचा मानसिक व शारीरिक छळ सुरूच होता. ग्रीन हा अंगरक्षक नसून भक्षक होता. तो महाराजांचा मानसिक छळ करत होता. एके दिवशी महाराजांनी ग्रीनवर झडप टाकली आणि ग्रीनला उचलून आपटले. नरपशू आडदांड ग्रीनने महाराजांच्या पोटावर बुटाने जबरदस्त प्रहार केला. महाराज जमिनीवर कोसळले. महाराजांचा सेवक मल्हारीने धाव घेतली व महाराजांचे डोके आपल्या मांडीवर घेतले. महाराजांनी मल्हारीच्या मांडीवरच ‘जगदंब जगदंब’ म्हणत प्राण सोडले. तो दिवस होता २५ डिसेंबर १८८३. छत्रपती चौथ्या शिवाजी महाराजांचे अवघ्या विसाव्या वर्षी निधन झाले.

त्यांच्यावर अहमदनगर येथे दिल्लीगेटपुढील परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठ्यांचा राजा आपल्या ताब्यात असताना मारला गेला हे समजले तर जनतेत मोठी खळबळ उडेल हे ब्रिटिशांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी महाराजांचे पार्थिव कोल्हापूरला नेण्याऐवजी नगरमध्येच अंत्यसंस्कार उरकून घेतले. अंत्यसंस्कारासाठी कोल्हापूरचे कोणीही उपस्थित नव्हते. महाराजांना अग्नी देण्याचे काम परशुराम उमाजी भोसले यांनी केले. ३० डिसेंबर १८८३ रोजी त्यांची रक्षा कोल्हापूरला पाठवण्यात आली. तेथे ती मिरवणुकीने पंचगंगा नदीत विसर्जन करण्यात आली. 

शिवाजी महाराजांच्या मृत्यूला त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या ग्रीन या आडदांड शिपायाची दांडगाई कारणीभूत झाली, ही गोष्ट नंतर अप्रत्यक्षपणे खुद्द पोलिटिकल रेसिडेंटच्या अहवालात उल्लेखिली आहे. ते म्हणतात, ‘दोन डिसेंबर १८८३ रोजी मी अहमदनगरच्या किल्ल्यात महाराजांची भेट घेतली. त्या वेळी त्यांची प्रकृती ठीक होती. त्यांना थोडा ताप येत होता एवढेच. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला ओळखले. त्या भेटीच्या वेळी महाराजांना इतक्या तडकाफडकी मृत्यू येईल असे मला मुळीच वाटले नाही.’ 

छत्रपतींच्या मृत्यूनंतर नगर येथे त्यांच्या शवाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांचा प्लीहा फुटून मृत्यू आल्याचे दिसून आले. नगर येथे त्यांची समाधी आहे. तेथे आता भव्य, सुंदर स्मारक बांधले आहे. महाराजांच्या दहनभूमीवर एक छोटी समाधी आजही रेसिडेन्शिअल हायस्कूलच्या समोर उभी आहे.

चौथ्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढे राजर्षी शाहू महाराज करवीर संस्थानचे छत्रपती झाले. राजर्षी शाहू महाराजांनी अहमदनगरला येऊन समाधीचे दर्शन घेतले. त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून त्यांच्या नावाने वसतिगृह सुरू करण्याची त्यांची प्रबळ इच्छा होती. पुढे १९१४ साली ‘श्री छत्रपती चौथे शिवाजी महाराज मराठा बोर्डिंग हाउस, अहमदनगर’ या नावानी वसतिगृह सुरू झाले. त्यातूनच पुढे जानेवारी १९१८ साली अहमदनगर मराठा विद्या प्रसारक समाज या शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली. 

करवीर छत्रपतींना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन.

- डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर
(इतिहास अभ्यासक, पुणे)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QVJNCT
Similar Posts
कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे छत्रपती राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी जन्माला आलेले संभाजीराजे हे कोल्हापूर राज्याचे दुसरे छत्रपती. २० डिसेंबर हा त्यांच्या स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयी...
स्त्री-शिक्षणासाठी झटलेल्या श्रीमंत इंदुमती राणीसाहेब राजर्षी शाहू महाराजांच्या स्नुषा श्रीमंत इंदुमती राणीसाहेबांनी स्त्री-शिक्षणविषयक, तसेच अन्य सामाजिक कार्यातून राजर्षी शाहू महाराजांचा वारसा समर्थपणे पुढे चालवला. ३० नोव्हेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
दुसरे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले (सातारा) साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले यांचा १४ ऑक्टोबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...
पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज १८ मे १६८२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना पुत्ररत्न झाले. हेच पुढे थोरले शाहू म्हणून इतिहासात अजरामर झाले. १५ डिसेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language